सर्वसामान्यांना वाढत्या प्रदुषणामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो याची माहिती असतेच. मात्र तुमच्या-आमच्या चिंतेत नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणामुळे भर पडण्याची शक्यता आहे. आपले आयुष्यमान प्रदूषणामुळे कमी होत असल्याची धक्कादायक माहिती या सर्वेक्षणामुळे उजेडात आली आहे.
ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी डिपार्टमेंटने केलेल्या सर्वेक्षणात प्रदूषणाने राज्यातील शहरांना घातलेला विळखा आपले आयुष्य कमी करत असल्याचे समोर आले आहे. राज्यात नागरिकांचे वयोमान प्रदूषणामुळे साडेतीन वर्षांनी कमी होत असल्याचे म्हटले आहे. प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पावलेल्या नागरिकांच्या एकूण संख्येपैकी १० टक्के हे मृत्यू महाराष्ट्रात झाल्याची आकडेवारी सांगते. त्यामुळे हा प्रश्न किती गंभीर होत चालला आहे, हे दिसून येत आहे.
प्रदूषणाची समस्या गंभीर असलेल्या राज्यांपैकी या सर्वेक्षणात पहिल्या स्थानावर उत्तर प्रदेश (१५ टक्के) तर महाराष्ट्र चौथ्या स्थानावर असल्यामुळे येत्या काही काळात वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर असणार आहे.